महाराष्ट्र

मुख्यमंत्री म्हणाले त्रिभाषासूत्री करणारच, राज ठाकरेंचा इशारा; करुन दाखवा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं म्हणे की, हिंदी ही तिसरी भाषा म्हणून आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. मग, सरकारला आत्महत्या करायचीच असेल तर करा

ठाणे : महाराष्ट्रातील शाळेत शासनाने इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सक्ती केल्यावरुन मुंबईसह महाराष्ट्रात मनसैनिकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला. त्यावरुन, राज्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद हिंदी विरुद्ध मराठी (Marathi) असे पाहायला मिळाले. येथील मिरा भाईंदरच्या (Mira bhayandar) जोधपुर स्वीट आणि नमकीन दुकान मालकाला मनसे सैनिकांनी मारहाण केल्यानंतर मिरा रोडमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर, मराठी व अमराठी असे मोर्चे मिरा भाईंदरमध्ये निघाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मिरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चालाही मोठा प्रतिसाद मिळालं. त्यानंतर, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मिरा रोड येथे जाऊन जाहीर सभा घेतली. सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्र्‍यांना इशारा दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं म्हणे की, राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषासूत्री आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. मग, सरकारला आत्महत्या करायचीच असेल तर करा. पण, महाराष्ट्रात इयत्ता 1 लीपासून हिंदी सक्तीची करण्याचा  तुम्ही फक्त प्रयत्न तर करून बघा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू, असा इशाराच राज ठाकरेंनी मिरा भाईंदर येथील सभेतून दिला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडता, कोणाच्या दबावाखाली, तुमच्यावर कोण दबाव टाकत आहे? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच, केंद्र सरकारकडून हा दबाव पहिल्यापासून टाकला जात आहे, काँग्रेस सरकार असतानाही तोच दबाव टाकला होता, असे म्हणत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा दाखला राज ठाकरेंनी दिला.

मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता, गुजराती व्यापारी आणि गुजराती नेत्यांचा होता. आचार्य अत्रे यांचे पुस्तक वाचत असताना मला कळले,  ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात आंदोलन झाले, मोरारजी देसाई यांनी गोळ्या घालून मराठी लोकांना ठार मारले.  यांचा मुंबईवर डोळा आहे, हे तुम्हाला चाचपडून बघत आहेत. हिंदी भाषा आणली तर बघू मराठी माणूस जिवंत आहे का, जर तो शांत दिसला तर हिंदी भाषा आणायचा पहिला प्रयत्न असेल, हळू हळू मुंबई गुजरातला मिळवायची हा यांचा प्रयत्न आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, हे सर्वप्रथम वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं, असा इतिहासही राज ठाकरेंनी सांगितला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!